You are currently viewing तो निघालाय….

तो निघालाय….

राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ पदयात्रेवर हेरंबकुलकर्णी यांची कविता

तो निघालाय….

तो निघालाय
दक्षिणेकडून उत्तरेकडे
उत्तर नसलेल्या प्रश्नांना स्पर्श करत
विमान,जेट,हेलिकॉप्टर,बुलेटप्रूफ गाड्या,सारे हाताशी असतानाही
धुळीच्या रस्त्यावरून तो निघालाय….

गर्दीचा गैरफायदा घेत
बापाच्या चिंधड्या झालेल्या प्रदेशातून
पुन्हा त्याच गर्दीवर विश्वास टाकत
हिंसेलाही लज्जित करत तो निघालाय..

पूर्वीही असेच राजे निघत
अश्वमेध करायला, सैन्य घेऊन
जिंकत जिंकत
रक्ताचा सडा शिंपडत—
पण तो नि:शस्त्र आहे
प्रेम आणि संवादाचे शस्त्र घेऊन

राज्य जिंकण्याचे सोडाच
निवडणूक जिंकण्याचीही गोष्ट तो बोलत नाही
पक्षाच्या सीमा ओलांडून समविचारींना कवेत घेत तो निघालाय

फक्त येईल त्याला प्रेमाने आलिंगन देत,
एकट्या पडलेल्या
व्यवस्थेत हरलेल्या
फाटक्या
केविलवाण्या माणसांना
मायेची ऊब देत तो निघालाय…

त्याच्या वयाला न शोभणारा ,
घरातला प्रेमळ ज्येष्ठ माणूस
आबालवृद्धांना त्याच्यात भेटतोय
कुणाला भाऊ,कुणाला बाप,
कुणाला लेक अशा नात्यात हा पन्नाशीचा पोरगा लुभावतोय….
त्याला भेटून रडताहेत माणसं
त्यांच्या अश्रूत वाहताहेत,
व्यवस्थेने त्यांच्यावर केलेले शोषणाचे घाव

नुसते चालून होईल काय ?
लोकांशी बोलून होईल काय ?
हा दांडी यात्रेपासून
भूदान यात्रेपर्यंत
आणि चंद्रशेखर ते बाबा आमटेपर्यंत
खिल्ली उडवणारा
ऐतिहासिक प्रश्न त्यालाही विचारला जाईल…
पण
असल्या प्रश्नांची उत्तरे वर्तमान
नाही
तर
इतिहासच देत असतो…

हेरंबकुलकर्णी
अकोले जि अहमदनगर
8208589195

Leave a Reply